नवी दिल्ली वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधून कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये हालचालींना चांगलाच वेग आला आहे. काश्मीरमध्ये ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे अशा अफवा पसरविणारे 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असून आतापर्यत 4 ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.खबरदारी घेत केंद सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
कलम ३७० रद्द केल्यानंतर सोमवारी काश्मीरमध्ये शांततेत ईद साजरी करण्यात आली. मात्र काही समाजकंटकांनी ट्विटरद्वारे जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आल्याने त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती,मात्र काश्मीरच्या सचिवानी काश्मीरमध्ये ईद शांततेत साजरी झाली असल्याचे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि अशी कोणतीही घटना न घडल्याचे स्पष्ट केले.
खबरदारी म्हणून आणि कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून अफवा पसरविणाऱ्या 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच या अकाऊंट पैकी 4 अकाऊंट आतापर्यत बंद करण्यात आले आहे.