बहुजननामा ऑनलाईन : मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूंनाही साथ देत आहेत. मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी असा आरोप केली की, स्वत:च्या स्वार्थासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधी कॅमेरासमोर येऊन रडतात. भारताने अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या प्रकरणाबद्दल तौवहिदी यांनी काही ट्विटस केले आहेत. त्यापैकी एका ट्विटमध्ये त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या तौवहिदी यांनी भारताचे अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कायमच काश्मीर हा भारताचा भाग असल्याची भूमिका घेणाऱ्या तौवहिदी यांनी अनुच्छेद ३७० संदर्भातील निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर टिका केली आहे. त्यात ही त्यांनी भारतात सत्तेवर असणाऱ्या भाजपाचा प्रमुख विरोधी असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यावर तौवहिदी यांनी शेलक्या शब्दात टिका केली की, “राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. हे स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत,” असं तौवहिदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
https://twitter.com/Imamofpeace/status/1160568511397109760
राहुल गांधी जम्मू काश्मीरमधील सध्याच्या स्थितीवर बोलतांना म्हणाले होते की, काश्मीर खोऱ्यात हिंसाचार सुरू असल्याचे काही अहवाल सांगत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत आहेत, अशी टीका त्यांनी शनिवारी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ११ ऑगस्टला तौवहिदी यांनी ट्विटवरुन राहुल गांधींवर ही टिका केली आहे.