पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशातली जनता घराणेशाही, कुटुंबशाही, परिवारवादाला कंटाळली आहे. यातच अडकलेल्या लोकशाहीला खऱ्या अर्थाने मुक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभेची खरी लढाई ही भाजपविरूद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच होणार आहे. कॉंग्रेस ही तिसऱ्या क्रमांकावर राहील,’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज पुणे येथे व्यक्त केले.
पुणे लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारासाठी एसएसपीएमएसच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. “राजकारणात सर्वत्र घराणेशाही आहे, मक्तेदारी आहे. ती मोडून काढण्यासाठीच वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्याच्या भीतीमुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. पण नातवाला मावळातून उमेदवारी दिली,’ अशी टीका आंबेडकर यांनी केली.
“आम्ही पहिल्यांदाच वंचित घटकांना उमेदवारी दिली. इतकेच काय, त्यांची जातही जाहीर केली. म्हणूनच आम्हाला मोठा पाठिंबा मिळत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षात घराणेशाही व अन्य कारणांमुळे अनेक घटक “वंचित’ राहिले आहेत. त्या सर्वांचाच आम्हाला “आतून’ पाठिंबा आहे,’ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशात अराजक माजवले असून एकाधिकारशाही सुरु केली आहे. एकीकडे देशप्रेमाचा आव आणणारे मोदी दुसरीकडे देशाची संपत्ती कवडीमोल भावात उद्योगपतींना विकत आहेत. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मला भेटायला बोलावले होते. मात्र मी गेलो नाही. त्यांना २३ मे नंतर मोदी सरकारचा पराभव झाल्यानंतर मी त्यांना नक्की भेटेन, असेही ते म्हणाले.