मुंबई :बहुजननामा ऑनलाइन टीम – माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी लोकांच्या घरी जाऊन आरोग्य विषयक माहितीचं संकलन करत आहेत. कोरनातून बरे झालेले, बरे झाल्यानंतरची त्यांची स्थिती आणि आरोग्याविषयक इतर माहिती संकलित केली जात आहे. या अनुषंगानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा कोरोना विषयक आढावा घेतला. यावेळी त्यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “अनलॉक प्रक्रियेत आता दळणवळण आणि नियमित व्यवहार सुरू झाले असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन मास्क लावणं, सामाजिक अंतर राखणं, हात स्वच्छ धुणं या त्रिसुत्रीचं काटेकोर पालन करायला हवं. त्यादृष्टीनं लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप द्यावं” अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
पुढे बोलताना सीएम ठाकरे म्हणाले, “कोकण विभागात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम गाव पातळीवर राबवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं. कोरोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चितच उपयोग होईल. वैद्यकीय अधिकाऱ्याना ट्रीटमेंट करताना काही अडचणी येत असतील तर त्यांनी टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.” अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. याबाबत ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं. पुणे विभागातील 5 जिल्ह्यांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.