अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मजबूत सरकार आहे. सरकार फक्त टिकण्यासाठी चालतेय, असे केवळ विरोधक म्हणतात. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Social justice minister Dhananjay Munde) यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे.
अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करताना मुंडे म्हणाले, सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्ष असे आम्ही एकरूप असून महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करीत आहोत. महाराष्ट्रात जी विकासकामे दिसतात, त्या सर्व कामांचे श्रेय सरकारमधील तिन्ही पक्षांचे आहे. विरोधी पक्ष आम्ही केलेल्या चांगल्या कामाला चांगले कधी म्हणणार नाही. कारण, ते विरोधी पक्षाचे कामच आहे. विरोधी पक्ष हा आमच्यावर कायम टीका करणार आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्या दिवसापासून विरोधी पक्ष टीकाच करीत आहे.पंकजा मुंडे यांनी राज्यातील सरकार ‘स्थगित सरकार’ असल्याची टीका केली होती. त्याबाबत विचारले असता, मुंडे म्हणाले, त्यांना स्थगितीचा अर्थ कळाला तर चांगले होईल असे ते म्हणाले.