पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सत्ताधारी नेते ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात त्यावर निर्बंध का घालत नाही, असा खडा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. चर्चेपासून पळ काढण्यासाठीच अधिवेशन आल्यानंतर कोरोना आठवतो असाही आरोप त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात शुक्रवारी (दि.19) युवा वॅारियर या भाजप युवा मोर्चाच्या नव्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाटील म्हणाले, उद्या शनिवारी (दि. 20) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत पुण्यात वशाटोत्सवाला येत आहेत. त्याठिकाणी संख्येवर निर्बंध नाहीत. महाविकास आघाडी अनेक ठिकाणी आंदोलन करत आहे, तिथे निर्बंध नाहीत मग शिवजयंतीवरच निर्बंध का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, धनंजय मुंडे प्रकरण, औरंगाबाद मधील पीडितेचा युवक अध्यक्ष विरोधात आक्रोश यावर आम्ही तोफ डागू त्यावर काय उत्तर देणार ? वाटल्यास online अधिवेशन घ्या पण 2 महिने घ्या. आता कुठे अर्थचक्र रुळावर येत आहे. त्यामुळे परत लाॅकडाउन करु नये असे ते म्हणाले.