बहुजननामा ऑनलाइन टीम –
चीनने लखाडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात चिनविरोधात संतापाची लाट उसळली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखाडमध्ये घुसखोरी झाली नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता सीडीएस जनरल रावत यांच्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनीच लडाखमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे कबुल केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लडाखमधील परिस्थिती 1962 नंतर सर्वात गंभीर बनली असल्याचे म्हटले आहे. जयशंकर यांनी पुस्तक प्रकाशनापूर्वी रेडिपला मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी लडाखमधील परिस्थिवर भाष्य केलं आहे. सध्या 1962 नंतर सर्वात गंभीर परिस्थिती ओढावली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. गेल्या 45 वर्षात पहिल्यांदा एलएसीवर आमच्या सैनिकांना हौतात्म्य आले. सीमेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे.
कराराचा सन्मान व्हायला हवा
लखाडसह सिमेवरील वादामध्ये एकतर्फी तोडगा निघत नाही. यामध्ये प्रत्येक सामंजस्य कराराचा सन्मान व्हायला हवा, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. गेल्या दशकभरात अनेकवेळा चीनसोबत सीमा वाद उद्भवला आहे. डेपसांग, चूमर आणि डोकलाम. काही ठिकाणी हा वाद वेगवेगळ्या प्रकारचा होता. सध्याचाही वाद अनेक बाबतीत वेगळा आहे.
चर्चेद्वारे तोडगा काढला पाहिजे
प्रत्येक वादावेळी एकच गोष्ट समोर येते, की तोडगा हा चर्चेद्वारे काढला गेला पाहिजे. आम्ही चीनसोबत सैन्य आणि राजनैतिक दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहोत. दोन्ही गोष्टी सोबत पुढे जात आहोत,असेही जयशंकर यांनी सांगितले. तसेच दोन्ही देश एकत्र आले तर हे शतक आशियाचे असेल. या अडचणींमुळे यामध्ये बाधा येऊ शकते. चांगले संबंध दोन्ही देशासाठी महत्त्वाचे आहेत. यात अनेक समस्याही आहेत, हे मी स्वीकारतो, असेही जयशंकर म्हणाले.
तर सैन्य कारवाईचा विचार – रावत
चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वी सीमेवर युद्धसदृष्य परिस्थिती असल्याचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की, लडाखमध्ये चिनी सेनेला मागे हटविण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा सुरु आहेत. मात्र, सैन्य आणि राजनैतिक चर्चा अपयशी ठरली तर शेवटी सैन्य कारवाईचा पर्यायावर विचार केला जाणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले होते.