मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आंबेडकरी लोकांची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांविरोधात राज्यातील सुमारे शंभर संघटनानी एकत्र येऊन गणराज्य आघाडी स्थापन केली आहे. येत्या 5 मार्च रोजीआघाडीची पुण्यात बैठक होत आहे. रिपाइं नेते रामदास आठवले आणि भारिप नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांना हा मोठा राजकीय हादरा समजला जातोय.याआघाडीमधे आंबेडकरी चळवळीतील वक्त्या सुषमा अंधारे, सुरेश माने (बीआरएसपी राष्ट्रीय महासचिव), सुनिल खोब्रागडे, श्याम गायकवाड आदी नेत्यांच्या संघटनांचा समावेश आहे.
आठवले सुरवातीचे काही दिवस काँग्रेसबरोबर राहिले त्यांनतर शिर्डी लोकसभा मतदार संघात पराभव झाल्यानंतर त्यांनी मग काँग्रेसला धड़ा शिकवण्याची भाषा करत भाजपशी मैत्री केली. याबदल्यात आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळविले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आता ते पुन्हा आंबेडकरी जनतेला भाजपच्या दावणीला बांधण्याचा विचार करत आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये नाराजीचा सूर काही प्रमाणात दिसत आहे .
आंबेडकरांनी एमआयएमला सोबत घेवून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि खासदार ओवेसी यांच्या सोबत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. या नवीन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहुन त्यांनी भाजपा विरोधात चांगलेच रान पेटवल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे आंबेडकरांनी काँग्रेस आघाडित सहभागी व्हावे, यासाठी कोंग्रेस प्रयत्न करीत आहे. मात्र काही मुद्दे उपस्थित करत आंबेडकर दूर जात आहेत, या भावनेतून सुमारे 100 संघटना आता एकत्र आल्या आहेत. या संघटना प्रत्यक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरतात की दबावगट म्हणून काम करतात यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.