परभणी : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील ७३ मतदार संघात ४० ते ५० हजार मतदान हे धनगर समाजाचे आहे. जर धनगर समाजाला एस.टी.च्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर अनेक मतदार संघ राखीव होतील. त्यातून प्रस्थापित राजकारण्यांचा मार्ग अवघड होणार आहे. आरक्षणातून धनगर समाज राज्यकर्ता बनेल या भीतीपोटी धनगर समाजाला जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते सुरेश भुमरे यांनी सांगितले.
सध्या धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असून निवडणुकीच्या अनुषंगाने या प्रश्नाकडे धनगर समाजासह सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत ३६ व्या क्रमांकाला धनगर समाजाला एस.टी.चे आरक्षण दिले आहे. परंतु केवळ धनगर ऐवजी धनगड असा अपभ्रंश झाल्याने महाराष्ट्रातील धनगर समाज एस.टी.च्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. तेव्हा आंबेडकरांनी घटनेत दिलेल्या आरक्षणाची केवळ अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे भुमरे म्हणाले.
कित्येक वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला धनगर समाजाने पाठबळ दिले; परंतु आश्वासनाशिवाय समाजाच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून समाजाची फसवणूक झाली आहे. परंतु सध्याच्या युतीच्या सरकारमध्ये राज्य मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री व राज्यसभेवर एक खासदार देवून समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. समाजाचे नेते देखील शासन दरबारी आरक्षणाचा प्रश्न पुढे रेटण्यास व दबाव टाकण्यास कमी पडत आहेत. लोकलेखा समितीच्या अहवालानुसार देखील धनगर जमात ही अनुसूचित जमातीची सर्व निकष पूर्ण करते. त्यामुळे एस.टी.च्या सवलती देण्याची शिफारस अहवालात केली आहे. दरम्यान, प्रा.रामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा लढा सुरू असून अनेक नव्या दमाचे कार्यकर्ते आंदोलनाला ताकद लावत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या लढ्याला यश येईल, अशी आशा सुरेश भुमरे यांनी बोलून दाखविली.