नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर दलित चळवळींना वेग देणाऱ्या नागपूर शहराच्या रेल्वे स्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव देण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाच्या शिष्टमंडळाने केली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे डिआरएम सोमेश कुमार यांची भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश महासचिव सागर डबरासे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन वेदेन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा अंगिरकार केला. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळे नागपूरची विशेष अशी ओळख आहे.
वर्षभर नागपूरला आंबेडकरी अनुयायांची रेलचेल येथे सुरु असते. त्यामुळे रेल्वेस्थानकाला दीक्षाभूमी जंक्शन नाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यासोबतच प्लॅटफार्म तिकिटाचे दर आणि तिकीट रद्द करताना कपात होणारी रक्कम कमी करावी, रेल्वेस्थानकावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. या शिष्टमंडळात प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवि शेंडे, उपाध्यक्ष मिलिंद मेश्राम, सल्लागार चंद्रकांत दहिवले, आनंद चौरे, महिला आघाडी अध्यक्ष वनमाला उके, अरुण फुलझेले, प्रशांत नारनवरे, विशाल वानखेडे, नालंदा गणवीर, नंदिनी सोनी, चारुशीला गोस्वामी, माया शेंडे, रवि वंजारी, कमलेश शंभरकर, आनंद बागडे, गोवर्धन भेले, विशाल शेंडे, देवेद्र डोंगरे, विनोद मोहोड, मनोज भगत, भीमराव दुपारे यांचा समावेश होता.