प्रकाश आंबडेकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. त्या दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी रामदास आठवले यांचा अत्यंत तुच्छ स्वरूपात उल्लेख केला आहे. आम्ही कुणाच्याही मागे जात नसून आम्ही निवडणुकीसाठी एमआयएम सोबत अधिकृत युतीची घोषणा केली आहे आणि आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवू असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अकोला कि सोलापूर या प्रश्नाचे उत्तर देताना आंबेडकर म्हणाले कि या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही या प्रश्नाचे उत्तर येणार काळच देईल असे ते म्हणाले आहेत. काल लक्ष्मण माने यांनी जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला दोन्ही ठिकाणी लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर आज प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत आमचा क्रमांक एकचा शत्रू हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असणार आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तर एमआयएम सोबत केलेली युती निवडणुकीच्या नंतर हि कायम रहाणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हणले आहे. प्रकाश आंबेडकरांनी रामदास आठवले यांना कुत्र्या मांजराची उपमा दिल्याने दोघांमध्ये नव्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर आठवले त्यांच्या या जहरी टीकेला उत्तर देणार का असा हि सवाल सर्वत्र विचारला जातो आहे.