मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेच्या तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार असल्याची माहिती देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी दिली. तसेच, त्यांनी सांगितले कि, ‘२०३१ पर्यंत आपल्या भारताची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाणार आहे. डॉ. विक्रम साराभाई आणि होमी भाभा यांनी १९६०-७० च्या दशकांत केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहेत’. दरम्यान, डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात सोमवारी ‘अंतराळात भारत व अणुऊर्जा’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा क्षेत्रात कार्यरत संशोधकांनी आपले विचार मांडले.
‘सध्या देश आर्थिक क्षेत्रात विकसनशील असला तरी अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा या क्षेत्रात भारत विकसित देशांच्या यादीत आहे. याचे संपूर्ण श्रेय डॉ. सारभाई व डॉ. भाभा यांनाच जाते. त्यावेळी त्यांनी स्वप्न पाहिले, त्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी सरकारनेही त्यांच्या प्रयात्नांना सहकार्य दिले. त्याचीच फळे आपल्यासमोर आहेत.’ तसेच देशात ऊर्जेची मागणी वाढत आहे, तरी सध्या औष्णिक निर्मितीतूनच सर्वाधिक वीज मिळत असली तरी त्यातील प्रदूषणाचे प्रमाणही खूप आहे. परंतु आता अणुऊर्जेच्या वापराद्वारे औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषण कमी करता येणार असल्याची माहिती चिदंबरम यांनी सांगितले. यावेळी डॉ. साराभाई यांच्या कन्या पद्मभूषण मल्लिका साराभाई, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.एम. चित्रे, नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सचे अध्यक्ष ए. पी. जयरामन, सरचिटणीस सुहास नाईक-साटम, नेहरू विज्ञान केंद्राचे शिवप्रसाद खेनाड आदींनी या चर्चासत्रास उपस्थित लावली होती.
त्याचप्रमाणे, इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार म्हणाले, ‘डॉ. साराभाई यांच्या त्यावेळच्या प्रयत्नामुळेच आज मंगळ, चांद्रयान यासारखे प्रकल्प आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहेत. भारताने क्रायोजनिक इंजिन देशात तयार केले आहे. जीएसएलव्हीच्या तीन यशस्वी मोहिमा केल्या आहेत. पुढील काळात लवकरच उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याबाबतही विचार सुरू आहे. भारताने सोडलेला उपग्रह समुद्रात नाविकांना दिशा देत आहे. या यशाचे श्रेय डॉ. साराभाई यांनाच जाते.’
राष्ट्रीय पर्जन्यमान क्षेत्र प्राधिकरणाचे सीईओ डॉ. अशोक दलवाई यांनी सांगितले कि, ‘कृषी क्षेत्रात भारत ‘सुपर पॉवर’ आहे. दूध उत्पादनात अग्रेसर आहे. पण कृषीसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण नसल्याने देशातील शेतकरी संकटात आहे. अणुउर्जा व अंतराळ विज्ञान या दोन्हीच्या सक्षम वापराद्वारे समस्या दूर करता येईल’, असे मत यांनी व्यक्त केले.