औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – मागासवर्गीय विद्यार्थ्य़ांकडून कोणत्याही महाविद्यालयाने शुल्क घेऊ नये. अशा तक्रारी आल्यास संबंधित महाविद्यालयावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिला. तर केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या शिवष्यवृत्ती आणि दहावीपूर्वीच्या शिष्यवृत्ती योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
डॉ. सुरेश खाडे औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे औरंगाबाद विभागातील सहायक आयुक्त, समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
जिल्हा समाजकल्याण अधिकाऱी आणि जिल्हा परिषदेकडे दहावीपुर्वी शिष्यवृत्तीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ती सगळी प्रकरणे १५ दिवसांत निकाली काढावीत. तसेच वसतीगृहांचे प्रवेश शंभर टक्के पुर्ण करावेत. ५ टक्के खास बाब प्रवेशासाठी प्राप्त प्रस्तावानुसार याद्या सर्व सहायक आयुक्तांना तात्काळ सादर कराव्यात. असे निर्देश दिले. तसेच पात्र विद्यार्थ्यांपैकी कुणीही मागासवर्गीय विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले.