नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवमान प्रकरणात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ट्विट प्रकरणात स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. आता २० ऑगस्ट रोजी शिक्षेची सुनावणी होईल. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रशांत भूषण म्हणाले होते की, हे ट्विट अप्रिय वाटेल पण अवमान नाही.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, प्रशांत भूषण यांनी भारतीय मुख्य न्यायाधीश (सीजेआय) एस.ए. बोबडे आणि चार माजी मुख्य न्यायाधीशांबाबत केलेल्या दोन स्वतंत्र ट्वीटची स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध अवमान कार्यवाही सुरू केली होती. सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना नोटीस पाठवली होती.
या नोटीसला उत्तर देताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले होते की, ‘सीजेआयवरील टीका सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करत नाही. दुचाकीवर असलेल्या सीजेआयबद्दलचे ट्विट कोर्टामध्ये सामान्य सुनावणी न झाल्याबद्दल त्यांचा क्लेश दाखवत आहे. या व्यतिरिक्त चार माजी सीजेआयबद्दलच्या ट्विटमागे माझी विचारसरणी आहे, जी भलेही अप्रिय वाटेल पण अवमान नाहीये.’
न्यायालयीन अधिनियम कलम १२ अन्वये ठरवण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतुदीनुसार, दोषीला सहा महिने तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता शिक्षेबाबत चर्चा २० ऑगस्ट रोजी होईल. यानंतर सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.