अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – जिल्ह्यातील पारधी समाज अनेक शतकापासून सुविधांपासून वंचित आहे. या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी दादाजी आदिवासी फासेपारधी संघटनेने सुरू केलेल्या आमरण उपोषणाला समर्थन दर्शवित जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी उपोषण मंडपाला भेट दिली. या बाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन फासेपारधींच्या रखडलेल्या समस्या त्वरित निकाली काढण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली.
फासेपारधी समाजाच्यावतीने प्रलंबित मागण्यांकरिता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. फासेपारधी कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी आदींसह विविध समस्यांकरिता गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. परंतु याची दखल शासन घेत नाही. फासेपारधी संघटनेच्या या मागणीला जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी समर्थन दर्शवून मतीन भोसले यांनी पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्याकरिता सुरू केलेल्या प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने विभागीय आयुक्त यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आज शेकडो महिला याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकल्या होत्या. या शिष्टमंडळात मयुरा देशमुख, कीर्तीमाला चौधरी, शिला पाटील, मनाली तायडे, नीलिमा विखे, सपना माहोरे, शोभना देशमुख, भाग्यश्री मोहिते, गायत्री देशमुख, अंजली ठाकरे, सुशिला धाबे, प्रिती बंड, प्रतिभा रोडे, स्मिता रडके, प्रतिभा ढोक, सीमा रहाटे, ज्योती गावंडे, वर्षा धाबे आदींसह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.