नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर पुनर्गठन (संशोधन) विधेयक, 2021 वर चर्चेवर उत्तर दिले. त्यादरम्यान त्यांनी कलम 370 रद्द करण्याचे फायदे सांगितले. ‘आम्ही कलम 370 रद्द करून सर्वात पहिले पंचायतीराज व्यवस्थेची स्थापना केली’, असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. पण आता यावर गृहमंत्री शहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की आम्ही कलम 370 रद्द करून सर्वात आधी पंचायतीराज व्यवस्थेची स्थापना केली.
डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सांगितले होते, की आता राजा राणीच्या पोटातून जन्मणार नाही तर दलित, गरीबांच्या मतदानातून त्याचा जन्म होईल. मात्र, काश्मिरमध्ये राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होते. या भागात तीन कुटुंबांची सत्ता राहिली. त्यामुळे त्यांना कलम 370 पाहिजे होते. मात्र, आता तिथंही राजा मतदानातून जन्माला येईल. जेव्हा राजा राणीच्या पोटातून येतो, तेव्हा जनतेची सेवा करत नाही. पण जेव्हा राजा मतदानातून बनतो तेव्हा जनतेची सेवा करतो, असेही ते म्हणाले.
आता हिशोब मागितला जातोय
कलम 370 रद्द करताना जी वचनं दिली त्याबाबत आम्हाला आता 17 महिन्यांनी विचारलं जातंय. पण 70 वर्षे तुम्ही काय केलं, त्याचाही हिशोब आणला का? असा सवालही त्यांनी केला.