नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल हा ‘लस उत्सव’ साजरा करण्याची घोषणा केली असतानाच देशात मात्र सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत आहे. देशात केवळ ५ दिवस पुरेल इतकाच कोरोनाचा लसीचा साठा शिल्लक असून देशभरातील अनेक लसीकरण केंद्रे पुरवठ्या अभावी बंद पडली आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील १०० ठिकाणचा पुरवठा खंडीत झाल्याने ही केंद्रे बंद करण्याची वेळ आली आहे. कोरोना विषाणुचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसीकरण वाढविण्यावर भर देण्यास केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होत असतानाही लसीवरुन केंद्र व राज्य सरकार यांच्या राजकीय वाद पेटला आहे. केंद्रातील मंत्री अपूर्ण माहिती देऊन महाराष्ट्रावर टिका करीत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रासह अनेक राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यात केवळ २ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. ओडिशामध्ये जास्तीतजास्त ४ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. बहुतांश राज्यात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत.
एप्रिल महिन्यात दररोज सरासरी ३६ लाख लस वापरल्या जात आहे. सध्या भारतात सुमारे २ कोटी लसींचा साठा उपलब्ध आहे. म्हणजे पुढील साडेपाच दिवस या लसी पुरतील. पुढील आठवड्यात राज्यांना २ कोटी २४ लाख लसींच्या मात्रा मिळतील. राज्यांशी चर्चा केल्यानंतर दर ४ ते ८ दिवसांनी लसींचा नवीन साठा पाठवला जात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात सध्या एका दिवसात सर्वाधिक ३ लाख ९० हजार लोकांना लस दिली जाते. त्यामुळे राज्यातील १५ लाख लसींचा साठा केवळ ४ दिवस पुरेल. उत्तर प्रदेश अडीच दिवस, उत्तराखंड ३ दिवस, मध्य प्रदेश साडेतीन दिवस पुरेल इतका कोरोना लसींचा साठा शिल्लक आहे.
आंध्र प्रदेशात सध्या केवळ १लाख ४ हजार डोस शिल्लक आहेत. ते १ दिवस पुरतील़ सध्या तेथे दररोज १ लाख लोकांना डोस देण्यात येत आहे. बिहारमध्ये २ लाख ६० हजार डोस शिल्लक आहेत. तेथे दररोज १ लाख ७० हजार लोकांना लस दिली जाते. तामिळनाडुत सर्वात चांगली परिस्थिती आहे. सध्या तेथे १७ लाख लसींचा साठा शिल्लक आहे. तेथे दरदिवशी केवळ ३७ हजार लोकांना लस दिली जाते.