पंढरपूर : बहुजननामा ऑनलाइन – संभाजी भिडे यांनी कोरोनासंदर्भात केलेल्या अजब वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता कारवाईचे संकेत दिले आहेत. भिडे यांनी यापूर्वी बागेतल्या आंब्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यात आता केलेले विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धीचा प्रकार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. भिडे यांचे वक्तव्य तपासून कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी पंढरपूरात बोलताना स्प्ष्ट केले आहे.
संभाजी भिडे यांनी सांगलीत लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बोलताना भिडे यांननी अजब विधान केले आहे. कोरोना हा मुळी रोगच नाही. कोरोनामुळे मृत्यू होणारी माणस जगण्याच्या लायकीची नाहीत असे विधान केले. एवढ्यावरच न थांबता मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, मास्क लावण्याची वगैरे काहीही गरज नसल्याचे धक्कादायक विधान देखील भिडे यांनी केले.
प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे जो तो आपली काळजी घेईल असे भिडे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड करावे अन् अशा नियम करणाऱ्या शासनाला फेकून द्यायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे. भिडे यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री पवारांनी समाचार घेत कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.