इचलकरंजी : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप- सेनेची युती झाल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने इतर पक्षाना सोबत घेऊन महाआघाडीचा प्रत्यन केला. पण त्याना किती प्रमाणात यश मिळेल हे काही सांगता येत नाही. शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करण्याचे तसेच शेत मालाला दीडपट हमीभाव देण्याची मागणी जाहीरनाम्यात समाविष्ट केली तरचं आम्ही आघाडीसोबत चर्चा करू नाहीतर आम्ही स्वबळावर लढू असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार शेट्टी बोलत होते.त्यामुळे राजकारण हे आमचा काही धंदा नाही. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढू असेही खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे. माझा पराभव करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातील. त्यामुळे माझ्या विरोधकांची गरिबीही हटेल मात्र निकाल बदलणार नाही असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
महाआघाडीत जागावाटपाबाबत तोडगा निघाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीत सहभागी होणार कि नाही याबाबत संभ्रम कायम आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची अद्याप आघाडी झाली नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे