मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरातून विरोध होत असून त्याचे पडसादही दिसत आहेत. या कायद्याला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. शांततेत आंदोलन करणार असल्याचे सांगितले असतानाही वंचितच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत सीएएचा निषेध केला. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण आले असून पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन करणारे वंचितचे नव्हते, असे स्पष्ट करत त्यांनी आरोप फेटाळले आहेत.
तर सीएएच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे भडकविण्याचे काम करत आहेत, असे म्हणत राज यांच्यावर निशाणा साधला आहे. जर आपण एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळली असेल तरच त्यांनी राज्यात बांगलादेश, पाकिस्तानी मुस्लिम किती याची आकडेवारी द्यावी. पुरावे नसताना राजकीय भाषणबाजी करण्यात अर्थ नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आंदोलनाबाबत बोलताना बुर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली असून ते कार्यकर्ते वंचितचे नव्हते, असे आंबेडकर म्हणाले. तर आंदोलक हिंसक बनवण्यामागे भाजप आणि आरआरएसचा हात होता. काहीजण तोंड बांधून आले असता त्यांनी ही दगडफेक केली असल्याचेही आंबेडकर म्हणाले. वंचितचे कार्यकर्ते चेहरे लपवून आंदोलन करत नाही आणि आंदोलन बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र केले जाते. चेहरे बांधून आलेल्या लोकांचा शोध करून कारवाई करण्याची मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.