बुलडाणा : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघर्ष समितीच्या वतीने समाजाचा राज्यस्तरीय मेळावा तसेच कैकाडी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. शहरातील भडेच ले आऊट येथील कैकाडी महाराज सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय मेळाव्यात राज्यभरातून कैकाडी समाजबांधव सहभागी झाले होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष एस. एन. गायकवाड होते. भटक्या विमुक्त महासंघाचे अध्यक्ष ॲड. शिरीष जाधव, कार्याध्यक्ष नारायण गायकवाड, उपाध्यक्ष रमेश गायकवाड, राज्य सरचिटणीस शाम गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, मनोज जाधव, शशी पवार, विजय माने, सुभाष पवार, शाम पवार, कुंभार समाज राज्य अध्यक्ष कैलास राऊत, मनोज पवार, दुर्गाताई गायकवाड, अनिल पवार, अंकुश गायकवाड, प्रदिप पवार, सिमा माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नव तरुणांची संघटना उभारणे व आरक्षणाचा लढा नव्याने सुरू करणे, पोटशाखा बंद करून रोटीबेटी व्यवहार सुरु करणे, वधू-वर परिचय मेळावे सुरू करणे, समाजातील पोटजातींमध्ये विवाह ठरविणे, समाजात शिक्षणाचा प्रसार करणे आदी ठराव या मेळाव्यात मांडण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. एल. गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, क्षत्रिय बंधन उठवुन संपूर्ण राज्यात कैकाडी समाजाचा एस.सी. मध्ये समावेश करणे आवश्यक आहे. यासाठी यापूर्वी नेमण्यात आलेला बापट आयोग शासनाने लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. समाजाला आरक्षण देऊन क्षत्रीय बंधन उठवले नाही तर त्यासाठी लढा उभारण्याची तयारी समाजाने ठेवावी, असे आवाहन देखील त्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सुनिल गायकवाड व जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच विनोद जाधव, राजेंद्र गायकवाड, छाया गायकवाड, संतोष जाधव या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रोहित जाधव, अनिल गायकवाड, अमोल गायकवाड, उमेश गायकवाड, गणेश जाधव, सचिन गायकवाड, किशोर गायकवाड, अनिकेत जाधव, रोशन जाधव, मनोज पवार, शाम पवार, राजेश जाधव, दिपक जाधव, मगन जाधव यांनी परिश्रम घेतले.