मुक्ताई नगर : बहुजननामा ऑनलाईन – कोणतेही सरकार हे कल्याणकारी असायला हवे मात्र आताचे शासन हे नफेखोर असून केवळ लुटण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आमदारांसाठी स्वतंत्र चळवळ सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मराठ्यांचे नव्हे, तर अवघ्या 169 कुटुंबाचे राज्य असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुक्ताईनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन सभेत त्यांनी रावेर लोकसभेतून नितीन कांडेलकर (रा.कोऱ्हाळा) यांची उमेदवारी जाहीर केली. शहरातील संत मुक्ताबाई महाविद्यालया शेजारील पटांगणावर गुरुवारी दुपारी आयोजित ही सभा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू झाली.
सभा नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने म्हणजे सायंकाळी 5.10 वाजता सुरू झाली. सभास्थळी ॲड .प्रकाश आंबेडकर यांचे सायंकाळी 4.40 वाजता आगमन झाले. मात्र, कार्यकर्त्यांच्या गराड्यातून व्यासपीठापर्यंत येण्यासाठी त्यांना 15 मिनिटे लागली. स्टेजवर आल्यावर संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. यामुळे स्वत: ॲड. आंबेडकर यांना हातात माईक घेऊन सभेत शांततेचे आवाहन करावे लागले. सायंकाळी 6.10 वाजता ॲड. आंबेडकर यांनी 25 मिनिटे भाषण केले.
येथील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढून एलएचबी कारखाना होणार असल्याच्या कारणावरून शेकडो कुटुंबांना बेघर केल्याचे ते म्हणाले. यानंतर अड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधीत केले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी रावेर लोकसभा मतदार संघासाठी वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून नितीन कांडेलकर (रा.कोऱ्हाळा, ता.मुक्ताईनगर) यांच्या नावाची घोषणा केली. तसेच उद्या सत्तेत आलो तर विद्यार्थ्यांना वसतिगृहातच पूर्ण सुविधा, शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ आणि ओबीसींना देखील शिष्यवृत्ती लागू करण्याची भूमिका जाहीर केली. ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाला “अ’, तर मराठा समाजाला मिळालेल्या 17 टक्के आरक्षणाला “ब’ म्हणावे. तसा कायदा मंजूर व्हायला हवा. मात्र, राज्यकर्ते केवळ भांडण लावण्याचे काम करत आहे, असे आंबेडकर म्हणाले. सूत्रसंचालन विश्वनाथ मोरे यांनी केले. भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी आमदार बळीराम शिरस्कर, परीट समाजाचे प्रदेश अध्यक्ष विवेक ठाकरे, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर, शहराध्यक्ष सुमित बोदडे, जळगाव एमआयएमचे फिरोज खान, रहेमान खान उपस्थित होते.