कोल्हापूर : समाचार ऑनलाईन – जिल्ह्यातील माणगाव येथे २१, २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद झाली. छत्रपती शाहू महाराजांनी या सभेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ अस्पृश्यांचे नाहीतर हिंदुस्तानचे पुढारी होतील,’ असे उद्गार काढले होते. ते पुढे डॉ. आंबेडकर यांनी सार्थ केले. या परिषदेच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ आजपासून झाला आहे.
माणगावमधील अस्पृश्य (दलित) समाजात एकी होती. महार, मांग, चांभार लोक धाडसी, शूर, अन्यायाविरोधी लढणारे होते. या लोकांना समाजात होत असलेला जातीभेद मान्य नव्हता. म्हणून जातीभेद ही व्यवस्था मोडून काढण्यासाठी, एकीने लढण्यासाठी माणगाव परिषदेचे नियोजन केले होते. यामध्ये थोरले नाना मास्तर, नागोजी यल्लाप्पा कांबळे, गणू मसू सनदी, कृष्णा तुकाराम कांबळे, कृष्णाजी देवू, यमा लिंगू, दत्तू सिंध, कासीम मास्तर आदी लोक एकत्र येऊन कार्य करत होते. त्या काळी समाज मंदिरात सार्वजनिक वाचनालय होते. तेथे थोरले नाना मास्तर लोकांना वर्तमानपत्राचे वाचन करून दाखवायचे. त्यांना वर्तमानपत्रातील बातम्यांतून भीमराव रामजी आंबेडकर हा तरुण खूप शिकला आहे ही बातमी समजली. तसेच निंगप्पा ऐदाळे (कोल्हापूर मिस क्लार्क बोर्डिंगचे सुपरिटेंडेंट) यांनी माणगावला भेट देऊन डॉ. आंबेडकर यांच्याविषयी अधिक माहिती दिली. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांना माणगावमध्ये आणण्याविषयी चर्चा सुरू झाली.
समाजातील पुढाऱ्यांचे एकमत झाल्यावर गावकामगार पाटील आप्पासाहेब पाटील यांच्या वाड्यावर जाऊन डॉ. आंबेडकर यांना माणगावमध्ये आणण्याविषयी शाहू महाराज यांना सुचवावे, अशी चर्चा झाली. आप्पासाहेब पाटील जैन समाजातील होते. ते पुरोगामी विचारांचे होते. त्यांना अस्पृश्य समाजाबद्दल जिव्हाळा होता. त्यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली आणि परिषदेबद्दल सांगितले. त्यावर महाराजांनी ‘मी मुंबईला जाईन व डॉ. आंबेडकरांना आमंत्रित करेन’ असे सांगितले. त्यानुसार त्यांनी केलेही आणि २१, २२ मार्च १९२० ही तारीख निश्चित झाली. डॉ. भीमराव आंबेडकर माणगावमध्ये येणार असे कळताच माणगावचे लोक आनंदी झाले. समाजातील प्रमुखांनी एक कमिटी स्थापन केली. त्यामध्ये मधली आळी, हाडकऱ्यांची गल्ली, हिणकऱ्यांची गल्ली, वरची गल्ली, खालची गल्ली यामधून लोक निवडले गेले.
आप्पासाहेब पाटलांची खूप मदत झाली. परिषदेला येणाऱ्या लोकांसाठी जेवण करण्यासाठी हवा तेवढा भाजीपाला दिला. समाज मंदिराजवळ मंडप उभारण्यात आला होता. थोरले नाना मास्तर यांनी रचलेल्या स्वागत गीतांना कासिम मास्तर यांनी चाल दिली. चंदाताई व चंद्राताई यांनी स्वागत गीत गायले. स्वागत बॅण्ड व्हन्नूरकीचा ठरवण्यात आला होता. तो बॅण्डसाठी १० रुपये घ्यायचा, पण डॉ. आंबेडकर येणार म्हटल्यावर स्वखुशीने आला. या परिषदेमुळे समाज प्रेरित झाला. अन्यायाविरोधात लढण्याचे बळ या परिषदेने समाजाला दिले. या परिषदेच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ आजपासून झाला आहे.