पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता सचिन वाझे प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरादर टीका करतना एक गौप्यस्फोट केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घ्या असा आग्रह शिवसेनेच्या काही नेत्यांनी मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे धरला होता, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे. मात्र, आपण त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे आज (रविवार) पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे काही नेते माझ्याकडे आले होते. त्यांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी मी ॲडव्होकेट जनरल यांचे मत मागवले होते. त्यावेळी त्यांनी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेऊ नये असा सल्ला मला दिला होता. तसेच सचिन वाझे यांना उच्च न्यायालायने निलंबित केले असून त्यांना पुन्हा सेवेत घेता येणार नसल्याचेही सांगितले होते. जर त्यांना पुन्हा सेवेत घेतले तर न्यायालयाचा अवमान होईल, असेही ॲडव्होकेट जनरल यांनी मला सल्ला दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोरोनाचे कारण देत ठाकरे सरकाने सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेतले. कोरोना काळात अधिकारी यांची गरज असल्याने वाझे यांना सेवेत घेतले असल्याचे सरकाने म्हटल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने सचिन वाझे यांना नुसतेच सेवेत सामावून घेतले नाही तर पोलीस दलातील अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या क्राईम ब्रँचमधील इटेलिजन्स युनिट या विभागाचा प्रमुख बनवले. या विभागाचा प्रमुख पोलीस निरीक्षक असतो. त्याला हटवून त्या ठिकाणी सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे महत्वाची प्रकरणे सोपवण्यात आली. सोळा वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना शिवसेनेने पद दिले, असे फडणवीस यांनी सांगितले. ज्यावेळी सचिन वाझे निलंबित होते त्या काळात ते शिवसेनेत होते. त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून काम पाहिले आहे. सचिन वाझे यांना महत्त्वाची प्रकरणे का देण्यात आली हे अद्याप मला समलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
अँटिलिया स्फोटक प्रकरणात ज्या काही गोष्टी समोर आल्या आणि त्यानंतर ज्या प्रमाणे सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. यावरून राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह लागले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने आम्ही या प्रकरणी सचिन वाझे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे सतत बोलत आहोत. परंतु त्यावेळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे जणूकाही सचिन वाझे यांचे वकिल असल्याप्रमाणे त्यांचा बचाव करत होते, अशी टीका फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर केली.