बहुजननामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात तरुणांना पर्यटनाचा मोह आवरत नाही. डोंगरावर, धबधब्यांच्या ठिकाणी, धरण परिसरात पर्यटनासाठी हजारो तरुण जात असतात. या तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही. सेल्फीच्या नादात अनेकानी जीव गमावले आहेत. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या कोरोनामुळे पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीदेखील काही तरुण लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून फिरायला जात आहेत. लॉकडाऊनचे नियम मोडत फरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सेल्फीच्या मोहात त्याने जीव गमावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अजय महांगडे (वय-22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बलकवडी धरणावर घडली आहे. मृत अजय वाईतील पसरणीतला रहिवासी आहे. अजयच्या अशा जाण्यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे. अजयच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळे मित्र बलकवाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सगळेजण मस्ती करत फोटो काढत होते. त्यावेळी अजय धरणाच्या काठावर उभा राहून सेल्फी काढत होता.
सेल्फी काढत असताना अजयचा तोल गेला आणि तो धरण क्षेत्रात पडला. पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यातच त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. त्याच्या मित्रांनी या घटनेची माहिती तात्काळ कुटुंबाला आणि पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजयचा मृतदेह बाहेर काढला. डोळ्यादेखत आपला मित्र आपल्या सोडून गेल्याने मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.