मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमध्ये जवळपास ३० लाख पात्र शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित असल्याचे समोर आले असतानाच त्यातच राज्यातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोणतेही कर्ज न घेता बोजा टाकण्यात आला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. राज्यात असलेल्या दिव्यांग शेतकऱ्यांनी कर्ज मिळावे म्हणून दिव्यांग महामंडळाकडे अर्ज केले होते. असे एकूण १०९ शेतकरी आहेत ज्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाच्या खोट्या नोंदी करण्यात आल्या असल्याचे आरोप गजभिये यांनी केला आहे. मुंबईत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात पत्रकारांशी ते बोलत होते.
या शेतकऱ्यांनी फक्त अर्ज केला म्हणून त्यांच्या सातबाऱ्यावर कर्जाच्या नोंदी करण्यात आल्या असून बँकेकडून पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मिळाले नसल्याचा गंभीर आरोप आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे. युती सरकारने अपंग शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. सत्तेत असलेल्या युती सरकारच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सातबारे कोरे करण्याचा आश्वासन दिले होते, मात्र राज्यात एकही ऑनलाइन सातबारा कोरा झाला नसल्याचे गजभिये यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्रातील सातारा, गोंदिया, भंडारा, अमरावती या भागात ऑनलाइन सातबाऱ्याच्या प्रकरणात मूळ कुळाच्याच नोंदी काढण्यात आल्या आहे. त्या कायद्यालाच समाप्त करण्याचे काम युती सरकारने केले असल्याचा आरोपही गजभिये यांनी केला आहे.