मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नवीन पाणीपूरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अत्यंत कडाडून टीका केली आहे. नाशिकच्या पोटनिवडणुक प्रचारावेळी गुलाबराव पाटील यांनी राज यांच्यावर टीका केली आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. राज ठाकरे यांचे आडनाव ठाकरे नसते, तर ते संगीतकार म्हणून दिसले असते, अशा शब्दात राज यांच्यावर टीका केली आहे.
तसेच राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये केली जाते. मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे ? ही तुमच्याकडे दिसते तर थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांचा प्रचार करण्याकरिता गुलाबराव पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. मला पाकशाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले याचा मला आनंद आहे. पाणी हा विषय राज्यातील सर्व नागरिकांशी जोडलेला आहे. त्यामुळे मी या खात्याचा मंत्री म्हणून अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक वाड्या-वस्त्यांसोबत गावात पाणी पोहोचविण्यावर माझा भर असेल, असे गुलाबराव यांनी मंत्रिपद स्वीकारल्यावर सांगितले.