कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षांपासून खासदार असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना यंदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात महायुतीकडून लढणाऱ्या शिवसेनेला आत्तापर्यंत यशाने हुलकावणी दिली होती. पण यावेळी त्यांनी विजयश्री खेचून आणला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे ९६०३९ मते मिळवून विजय झाले. येथे राजू शेट्टींना वंचीत बहुजन आघाडीचा फटका बसला असल्याचे मानले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांना १,२३,४१९ मते मिळाली म्हणजे ही मते जर राजू शेट्टींना मिळाली असती तर ते विजयी झाले असते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा, साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक आणि नवमतदारांना माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली. त्याचा प्रत्यय या हातकणंगले लोकसभेच्या निकालातून समोर आला.आणि शेट्टींना पराभव स्वीकारावा लागला.
कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली
धैर्यशील माने ( शिवसेना )-५८५७७६
राजू शेट्टी – (स्वाभिमानी पक्ष )४८९७३७
अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी ) १२३४१९