हैदराबाद : बहुजननामा ऑनलाईन – देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणूका पार पडल्या परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ तेलगू देसम पक्षाचा (टीडीपी) नामुष्कीजनक पराभव झाला. त्यांना अवघ्या २५ जागांवर समाधान मानावे लागले. तर वाय एस आर काँग्रेसला पार्टीला जनतेने भरभरून मतं देत १५१ जागेवर पोहचवलंय. या पार्श्वभूमीवर एन.चंद्राबाबू नायडू यांनी गुरूवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. चंद्राबाबूंनी राज्यपाल ई.एस.एल.नरसिंहन यांच्याकडे राजीनामा सादर केला. राज्यपालांनी तो स्वीकारला असून वायएसआर कॉंग्रेसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी मागील काही दिवसांपासून सक्रिय असणाऱ्या चंद्राबाबूंसाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल दुहेरी हादरा ठरले आहेत. त्यामुळेच एन.चंद्राबाबू नायडू यांनी राजीनामा दिला.
दरम्यान, निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. लोकशाहीत जनतेचा कौल स्वीकारणे ही आपली जबाबदारी आहे, असे म्हणत चंद्राबाबूंनी टीडीपीचा पराभव मान्य केला. त्यांनी विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वायएसआर कॉंग्रेसचेही अभिनंदन केले.