सांगली : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात रामोशी समाज आजही काही ठिकाणी आदिवासी सारखे जीवन जगत असून त्यांच्या समोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. शिवाय याच जातीतील उमाजीराजे नाईक हा आद्यक्रांतिवीर असून इतिहासात त्याला स्थान तसे नगण्यच दिले आहे. अशा सर्व बाबीकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्या करीता आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र भर लक्षवेध अभियान राबवित आहे.
संघटनेचे नेते संजय मंडले, अंगद जाधव, मारुती शिरतोडे, सुनील दलवाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांची भेट घेतली व रामोशी समाज्याच्या मागण्या मांडून लक्ष वेधले. या मागण्यांमध्ये रामोशी समाजाचा समावेश अनुसूचित जमाती या प्रवर्गात करावा. भिवडी (ता. पुरंदर) येथील आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांचे जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. छ.शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील समाधीस्थळ परिसर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे व संपूर्ण विकास करावा. विमुक्त जातीमधील तरुणांसाठी शासनाने बार्टी या संस्थेच्या धर्तीवर स्वतंत्र शासकीय संस्था स्थापन करावी. रेणके आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने त्वरित लागू कराव्यात.संसद व विधिमंडळात उमाजीराजे नाईक यांचे तैलचित्र लावावे, यासह पंधरा मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी येणाऱ्या काळात रामोशी समाजाच्या मागण्यांबाबत वाचा फोडण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळात अंगद जाधव, मारुती शिरतोडे, संजय मंडले, राजाभाऊ गुजले, हिम्मतराव मलमे, सुनील दलवाई, हणमंतराव चव्हाण, रघुनाथ मंडले, वामन जाधव, आप्पासो चव्हाण, संदीप नाईक, दत्तात्रय जाधव, धनाजी चव्हाण, कालिदास बुधावले, विलास साठे, परमेश्वर गेजगे, विजय मदने, मधुकर चव्हाण, नवनाथ जाधव, शिवाजी चव्हाण, गोविंद चव्हाण आदी प्रतिनिधी सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई अशा जिल्ह्यातून आले होते. याप्रसंगी विधानपरिषदेवरील आमदार दीपक साळुंखे व आमदार गणपतराव देशमुख हे उपस्थित होते.