बहुजननामा ऑनलाइन टीम – मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत(Sharad Pawar) चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? असा सवाल भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच शरद पवारांनी पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन स्वत: सत्तेची सूत्रे हाती घ्यावी, असा टोलाही भातखळकर यांनी पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या आरोपामुळे मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. मुंडेच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सांगितले की, मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे म्हटले होते. त्यांनंतर रात्री उशीरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत तुर्तास तरी मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नाही असे ठरले आहे.
दरम्यानच्या काळात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी मुंडे प्रकरणावर चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंचीही भेट घेतली आहे. मात्र आयपीएस अधिकाऱ्याच्या या भेटीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच विश्वास नांगरे पाटलाची हकालपट्टी करावी अशी मागणी आपण कॅबिनेट सचिवांकडे करणार असल्याचे आ. भातखळकर यांनी सांगितले.
मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांच्या सत्तास्थापनेवेळी धनंजय मुंडे यांची भूमिका संशयास्पद वाटत होती, मुंडे हे अजित पवार गटाचे मानले जातात. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेवरून पक्षात तणाव निर्माण झाला होता. अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील, असे संकेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिले आहेत. मध्यंतरीच्या काळात भाजपा आणि मनसे नेत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेविरोधात ब्लॅकमेलिंगचे आरोप केल्याने संपूर्ण घटनेला वेगळेच वळण आले, त्यामुळे मुंडे यांच्या विरोधात असणारं वातावरण अचानक बाजूने बदलू लागले. कोणताही निर्णय घेण्याआधी संपूर्ण चौकशी होऊ द्या, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर निर्णय घ्या, असे आपण पक्ष नेत्यांना सांगितल्याचे काही आमदारांनी स्पष्ट केले.