नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना (Corona) प्रतिबंधक लशीचा (Vaccine) आपत्कालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum institute) आणि हैदराबादच्या भारत बायोटेकने (bharat biotech) प्रस्ताव पाठवले होते. मात्र, हे प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. लशीच्या सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे प्रस्ताव मंजूर झाले नाहीत, असे आज (बुधवार) सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेबद्दल पुरेसा डाटा दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाहीत. त्यांना अजून डाटा सादर करायला सांगण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
CDSCO च्या समितीने फायझर, सिरम आणि भारत बायोटेकच्या अर्जाचा आढावा घेतला. अनेक बैठका ही एक ठरलेली स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. एक ते दोन आठवडे ही प्रक्रिया चालेल, असे सिरम इन्स्टि्ट्यूट ऑफ इंडियामधील सूत्रांनी सांगितले.
कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टिपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहा कोटींपेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले जीव गमावले आहेत. सध्यातरी लस हाच या आजाराला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे.