बहुजननामा ऑनलाईन टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवण्याचे सामर्थ्य राखतो. मात्र, राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेतेमंडळी आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत, अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chauhan) यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेते बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. कोविड -19 च्या प्रोटोकॉलमुळे केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी आहे. यावरून मुख्यमंत्री चौहान यांनी गांधी, पवार आणि इतर नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
लोकांनी या विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाकारले आहे. शेतकऱ्यांनीही त्यांना दूर केले आहे, अशा परिस्थितीत या राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. कारण शेतकऱ्यांच्या या अवस्थेला ते जबाबदार आहेत. सर्व स्तरातून नाकारलेले लोक आता शेतकऱ्यांचे हितचिंतक बनू पाहत आहेत. त्यांचा ढोंगीपणा आता लोकांनाही कळून चुकला आहे, असेदेखील चौहान यांनी म्हटले आहे. एका हिंदी वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न; राहुल गांधी, शरद पवारांसह पाच नेते राष्ट्रपतींना भेटणार
दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत असलेल्या तीन कृषी कायद्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार असून, याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, विविध राज्यात अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
आज सायंकाळी गृहमंत्री शाह यांनी बोलावली शेतकरी नेत्यांची बैठक
दरम्यान, ‘भारत बंद’ आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सायंकाळी सात वाजता अचानक शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे, याआधी सरकारने येत्या 9 डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे. या बैठकीसाठी सिंधू, टिकरी आणि गाजीपूर बाॅर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना बोलवले असून, एकूण 13 नेते शहा यांची भेट घेतील, असे सांगण्यात येत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, मला फोन आला, गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही जाऊ आणि अन्य नेतेसुद्धा बैठकीला येतील. त्यांनी सात वाजता बोलविले आहे.