नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाना यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना देशभरातील इतर रिकाम्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवरील निवडणुकांची घोषणा निवडणुक आयोगाने शनिवारी तीन दिवसांपूर्वी केली. मात्र, त्यावेळी सातारा लोकसभा निवडणुकीचा त्यात समावेश नव्हता. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच भाजपा नेत्यांनाही हा मोठा धक्का होता. पण, सत्ताधाऱ्यापुढे निवडणुक आयोग आता नमले असून त्यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.
सातारा लोकसभेसाठी आता २१ ऑक्टोंबरला मतदान होऊन विधानसभेबरोबरच २४ ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता उदयनराजे यांना दिलासा मिळाला आहे. खासदार उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी भाजपाला अट घातली होती की विधानसभेबरोबरच लोकसभेची निवडणुक व्हावी. त्यामुळे उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी तसेच साताऱ्यात महाजनादेश यात्रा आली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेबरोबरच लोकसभेची निवडणुक होईल व लोकसभेबरोबर साताऱ्यांतील सर्व जागा जिंकण्याचा दावा केला होता.
मात्र, मागील शनिवारी मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा यांनी हरियाना, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्याचबरोबर देशभरातील रिकाम्या झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या जागांवरील निवडणुकीची घोषणा केली. त्यात ज्या १७ काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत पक्षादेश झुगारुन मतदान केले होते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्या जागेवरही निवडणुक घोषित झाली. मात्र, त्यात सातारा लोकसभेचा समावेश नव्हता. हा भाजपा नेते आणि खुद्द उदयनराजे यांना धक्का होता. त्यानंतर दिल्लीतील हालचाली सुरु झाल्या. केंद्र व राज्य सरकारच्या दबावापुढे झुकत निवडणुक आयोगाने आज तीन दिवसांनी सातारा लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.
विधानसभेनंतर लोकसभेची निवडणुक घेतल्यास भाजपामधील असंतोषाचा आपल्याला फटका बसेल, असे उदयनराजे यांना वाटत असल्याने त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी विधानसभेबरोबर निवडणुक घेण्याची अट घातली होती. मात्र, निवडणुक आयोगाने साताऱ्याचा समावेश न केल्याने भाजपा नेत्यांना अट पाळता आली नाही, असा समज निर्माण झाला. त्याचा प्रतिकुल परिणाम महाराजांना मानणाऱ्या समर्थकांवर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन केंद्रातून हालचाली सुरु झाल्या होत्या. शेवटी निवडणुक आयोगाने साताराची निवडणुक जाहीर केली. त्यामुळे आता उदयनराजे यांना दिलासा मिळाला आहे.
Visit : bahujannama.com