मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. दहा दिवसांपासून आंदोलन सुरू असताना दहा वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातील राज्य सरकारांना लिहिलं होत. त्यातील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेले पत्र चर्चेत आलं आहे. भाजप नेते बी. एल. संतोष यांनी हे पत्र समोर आणलं आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांना टार्गेट करताना त्यांच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या पत्राबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे.
शरद पवारांनी २०११ मध्ये ज्यावेळी पत्र लिहिलं, त्यावेळची परिस्थिती वेगळी असेल आत्ताची वेगळी आहे. स्वतः शरद पवार हे या देशातील कृषी क्षेत्रातील सर्वांत मोठे तज्ज्ञ आणि अभ्यासक समजले जातात, त्यामुळे त्यांच्या पत्रासंदर्भात ते खुलासा करतील, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर ज्या अर्थी त्यांनी तेव्हा पत्र लिहिलं आणि आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत. याचा अर्थ ते शेतकरी नेते असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांशी सहमत आहेत. लाखो शेतकरी रस्त्यावर उतरलेले असताना कोणताही नेता त्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही, याच दृष्टीने शरद पवार यांच्या भूमिकेकडे पाहायला हवं, असेही स्पष्ट केले.
काय म्हटले आहे शरद पवारांनी पत्रात?
शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना त्यांनी नोव्हेंबर २०११ मध्ये राज्य सरकारांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये खासगी कृषी समित्यांना परवानगी देण्याबाबत उल्लेख होता. तसेच विपणन रचनेत खासगी गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा बदलायला हवा, असं त्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. शेती व्यापार, शेतकरी आणि ग्राहक यांच्या हितासाठी शेतमालाच्या विक्रीसाठी नवा मार्ग शोधता येईल, असा मुद्दाही शरद पवारांनी या पत्रात मांडला होता.
शरद पवारांचे शेतकरी प्रेम नकली
शरद पवारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून, त्यावरून भाजपने पवारांवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं पत्र आज समोर आलं आहे. या पत्रात शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत त्यांनी लिहिलं आहे आणि आता शरद पवार आपली हीच भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आहेत. त्यामुळे त्यांचं शेतकरी प्रेम हे नकली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.