बहुजननामा ऑनलाइन टीम – जत-सांगोला रस्त्यावरून सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ज्वेलरी व्यावसाईकाच्या डोळ्यात चटणी टाकून चार अज्ञात दरोडेखोरानी तब्बल २ कोटी ३३ लाख रूपये किमतीचे ४ किलो ६०० ग्राम सोन्याची बिस्किटे जाग्यावर लंपास केली आहे. दरम्यान ही घटना गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास जत शहरापासून दोन किलोमीटर आंतरावरील माळी वस्ती येथे घडली आहे. याप्रकरणी बाळासाहेब वसंत सावंत (वय ३५, रा.पळसखेल, ता.आटपाडी, जि.सांगली) यांनी जत पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील सराफ व्यावसाईकात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, बाळासाहेब सावंत आणि त्यांचा एक सहकारी असे हे दोघे गुरूवारी सायंकाळी बेळगांव येथून २४ कँरेट सोन्याची बिस्किटे कापडी बँगेत भरून घेवून युनोव्हा गाडीतून जत जवळील शेगाव येथील सराफ व्यापाऱ्यास देण्यासाठी येत होते. त्यावेळी माळी वस्तीनजिक काही शंका येत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून ते दोघेजण थांबले होते. त्यांच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या व्हॅन गाडीतून तोंडावर कापड बांधून आलेल्या अज्ञात चार संशयित दरोडेखोरानी अचानक सावंत व त्याच्या सहकाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली.
यावेळी त्यांनी आरडाओरडा करून रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या वाहनाना हाथ दाखवून थांबण्याची विनंती केली. तोपर्यंत गाडीतील २ कोटी ३३ लाख १३ हजार ५०० रूपये किमतीचे सोने घेऊन जत शहराच्या दिशेने पसार झाले. जाताना दरोडेखोरानी दोघांचे मोबाईल फोन हिसकावून नेले आहेत. घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले याना समजल्यानंतर त्यांनी नाकाबंदी कडक करण्याचे आदेश दिले. त्यावेळी पोलिसानी तत्काळ घटनास्थळी भेट देवून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणाच्या तपासासाठी बेळगाव व आटपाडी येथे पोलीस पथक पाठविण्यात आले आहे