रायगड : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी हे गुरू नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या शिल्पाशेजारी समर्थ रामदासांचे शिल्प बसवून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम सुरु आहे तसेच हा राष्ट्रीय महापुरुषांचा मोठाअपमान आहे’,असा आरोप करत संभाजी ब्रिगेडने त्यास विरोध दर्शविला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील ‘जेएनपीटी’च्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पासोबत रामदास स्वामींचा पुतळा बसविल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्त डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचे शिल्प बसविण्याचे १९९८ मध्ये ठरले होते. मात्र, याच शिल्पात रामदास स्वामी यांच्याही पुतळ्याचा समावेश असल्याने मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यास विरोध दर्शविला होता. आघाडी सरकारच्या काळात हे प्रकरण मागे पडले, पण आता पुन्हा निवडणुकांच्या तोंडावर जाणीवपूर्वक सरकार छत्रपती शिवरायांशेजारी रामदास स्वामी यांचे शिल्प बसवून वाद निर्माण करू पाहात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या शिल्पाचे अनावरण करण्यात येणार आहे. याला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला असून वेळप्रसंगी आंदोलनही छेडणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेसाठी आर. एस. पवार, डॉ. सुभाष बागल, हेमाताई पाटील, बाबासाहेब दाभाडे, राहुल भोसले, शिवाजी चव्हाण, निलेश शेलार, राम भगुरे, ज्ञानेश्वर अंभोरे, वैशालीताई खोपडे, रवींद्र वहाटुळे, श्रीमंत गाडेकर, रेणुका सोमवंशी, रेखा वाहटूळे, राजेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती