मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित तरी केली होती. आज अघोषित आणीबाणी सुरू आहे. कलेच्या प्रांतात मुक्तता राहिली नाही लोकांच्या व्यक्त होण्यावर बंधने घातली जात आहेत. अमोल पालेकर आणि नयनतारा सहगल यांना विचार मांडू दिले नाहीत, असे मत 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केले. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात शुक्रवारी मॅजेस्टिक गप्पांचे उद्घाटन प्रेमानंद गज्वी यांच्या मुलाखतीने करण्यात आले. मकरंद जोशी यांनी प्रेमानंद गज्वी यांच्याशी संवाद साधला.
सर्व जातींतून होणाऱ्या आरक्षणाच्या मागणीवर गज्वी म्हणाले, आरक्षण जेव्हा दिले त्यावेळचा हेतू उदात्त होता. आज प्रत्येकाची आरक्षण मानसिकता बनत आहे. आरक्षणाचे मूळ कारण सापडते का याचा विचार आपण करत नाही. त्यामुळे त्यावर उपाय शोधत राहतो. आरक्षण जातनिहाय आहे. जात नष्ट केली तर आरक्षणाची गरज नाही. जात नष्ट करणे आपल्याला जमणार नाही. आज आपण इतके रंग पांघरून घेतले की नक्की कोणता रंग घालावा असा प्रश्न पडतो. त्यापेक्षा पांढरा रंग घातलेला बरा. त्यावर कोणताही डाग नाही, अशी टीका गज्वी यांनी राजकीय परिस्थितीवर केली. आजच्या परिस्थितीवर बोलायचे झाले तर तीन-चार नाटकं लिहावी लागतील, असे ते म्हणाले.