बहुजननामा ऑनलाइन – निरोप समारंभातील हार आणि पुष्पगुच्छ वाळले देखील नाहीत तोच एका पोलीस कर्मचाऱ्याला मृत्युने गाठल्याची घटना संपूर्ण पोलीस दलाला चटका लावून गेली. बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात सर्वांचा निरोप घेऊन बीडकडे परतत असताना गाडी पुलावरून नदीत कोसळल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्वत: घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे. महेश आधटराव (वय-40) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्माचाऱ्याचे नाव आहे.
महेश आधटराव हे नेकनूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी रात्री त्यांची गाडी नदीत कोसळली आणि यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. बीडकडे येत असताना खजाना विहीर परिसरातील महामार्गावर ताबा सुटल्याने गाडी (एमएच 23 एएस 6004) पुलावरून खाली कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. नेकनूर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉनस्टेबल महेश आधटराव यांची नुकतीच गेवराई येथे बदली झाली होती.
शनिवारी दुपारी त्यांच्यासह बदली झालेल्या इतरांना निरोप देण्यासाठी छोटेखानी समारंभ झाला. यावेळी बोलताना आधटरावांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. फेटे बांधून सर्वांसोबत त्यांनी फोटो काढले होते. मात्र, हा निरोप समारंभ त्यांच्या आयुष्यातील शेवटचा निरोप समारंभ ठरला. त्यांच्या निरोप समारंभातील हाल, पुष्पगुच्छातील फुले वाळण्यापूर्वीच त्यांच्यावर मृत्यू ओढवला.
काही दिवसांपूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील एका वृद्ध दाम्पत्याची झोपडी वादळी वाऱ्याने पडली. त्यावेळी महेश आधटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत: साहित्य आणून झोपडी बांधून दिली होती. तसेच स्वखर्चाने त्या दांपत्याला कपडे आणून दिले होत. समाज भान असलेल्या पोलिसाला पोलीस दल मुकल्याची भावना बोलून दाखवली जात आहे.