मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुरेसे भांडवल नसल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा थेट परवाना रद्द केल्याने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरबीआयने याआधीच शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते.शिवम बँकेतील २४ कोटी ४० लाखांचा घोळ केल्याप्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह एकूण ३७ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.
शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात येत आहे. २९ जानेवारी २०२१ पासून बँकेला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत”, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
खातेधारकांना दिला दिलासा
रिझर्व्ह बँकेने शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द केला असलता तरी खातेधारकांना मात्र दिलासा दिला आहे. पैसे जमा करणाऱ्या ९९ टक्क्यांहून अधिक खातेधारकांची रक्कम इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँकेत पैसे जमा असलेल्या खातेधारकांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.