बहुजननामा ऑनलाईन – राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या फोन टॅपिंग प्रकरणात दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांच्या चौकशीसाठी मुंबईला हजर राहण्यास वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी असमर्थता दर्शविली आहे. कोरोनामुळे सद्यस्थितीत हैदराबाद येथील कार्यालय सोडू शकत नाही. त्यामुळे माझ्याकडे करायच्या चौकशीबाबत प्रश्नावली पाठवावी, असे त्यांनी तपास अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले असून सोमवारी (दि. 3) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
ऑफिशियल सिक्रेट ॲक्टअंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल गुन्ह्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त शुक्लांना चौकशीसाठी बुधवारी हजर रहा असे समन्स बजावले होते. मात्र, कोरोनामुळे सध्या मुंबईला येणे शक्य नसल्याचे त्यांनी सायबर पोलिसांना कळविले आहे. मात्र संबंधित गुन्ह्याची एफआयआर प्रत आणि प्रश्नावली पाठवावी, त्याची मी तातडीने माहिती देईन असेही शुक्लांनी सांगितले होते. शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख म्हणून कार्यरत असताना गेल्या वर्षी 25 ऑगस्टला पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या रॅकेटबद्दल काही व्यक्तींचे फोन टॅप करून अहवाल बनविला होता. तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी दुसऱ्या दिवशी ताे गृहविभागाकडे सादर केला. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचे तसेच शुक्लांनी शासनाची फसवणूक व अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून अहवाल फेटाळला होता. या प्रकाराबद्दल शुक्लांनी दिलगिरी व्यक्त केल्याने कारवाई टळली होती. मात्र तोच गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 23 मार्चला उघड करून राज्य सरकारवर आरोप केले आहेत.