बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता राज्यात 15 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याची सूचना उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान ठाकरे सरकारला केली आहे. त्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर न्यायालयाने सणसणीत ताशेरे ओढलेत. पण कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावाने कांगावा करणार, अधिकाऱ्यांना टार्गेट देणार. राज्य सरकार या ताशेऱ्यातून काही धडा घेणार का? मुख्यमंत्री घराबाहेर पडणार का ? असे म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडेसिवीर, खाटा इत्यादींचा तुटवडा व अन्य प्रश्नांवर दाखल जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्यात किमान 15 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करावा. कारण आताच्या निर्बंधांनंतर लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. यातून हेतू साध्य होणार नाही. अत्यंत अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर पडण्याची परवानगी द्यावी. 15 दिवसांसाठी हा उपाय केला तर कोरोना रोखता येऊ शकतो, अशा सूचना न्यायालयाने ठाकरे सरकारला केल्या आहेत.