कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – रामोशी, बेडर, बेरड समाजाला आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण रामोशी समाज एकवटला आहे. न्याय मार्गाने आरक्षण सरकारकडून मिळवणारच, असा निर्धार जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी व्यक्त केला.
भेंडवडे येथे संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंकुश जाधव, राज्य युवा उपाध्यक्ष रोहित मलमे, कोल्हापूर संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, माजी आ. राजीव आवळे, भेंडवडेचे सरपंच काकासाहेब चव्हाण, उपसरपंच सुहास देसाई, सदस्य डॉ. संजय देसाई, राज्य कार्यकारिणी सदस्य जयसिंग चव्हाण, उदय माने आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने भेंडवडे येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जाहीर सभा घेण्यात आली. सभेपूर्वी आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत शितोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. खंडोबा मंदिरासमोरील मैदानावर झालेल्या सभेत रामोशी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश झाला पाहिजे. यासाठी समाजातील विविध मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, रामोशी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण रामोशी समाज संघटनेचे बळावर आपल्या हक्कासाठी वेळप्रसंगी संघर्ष करायला मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राज्य उपाध्यक्ष अंकुश जाधव, राज्य युवा उपाध्यक्ष रोहित मलमे, कोल्हापूर संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, माजी आमदार राजीव आवळे, हातकणंगले तालुकाध्यक्ष भरत नाईक, सुनील पसाले यांनी मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी भेंडवडे येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या संघर्ष यात्रेचे स्वागत ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच काकासाहेब चव्हाण यांनी केले. यानंतर संघर्ष यात्रेची प्रमुख मार्गावरून खंडोबा मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर संघटनेच्या विविध पदांवर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान करण्यात आली. स्वागत सानिका चव्हाण, दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन, तर आभार भगवान चव्हाण यांनी मानले.