पुणे बहुजननामा ऑनलाईन – इंग्रज बरे होते असे म्हणण्याची वेळ आमच्या राज्यकर्त्यांनी आणलेली आहे. जातीजातीत भांडणं लावून राज्यकर्ते स्वत: ची पोळी भाजत आहेत. पेशवाईची गिधाडं पुन्हा एकदा महाराष्ट्रावर झडप घालण्याच्या तयारीत आहेत. त्यांना आपण एक होऊन रोखणे गरजेचे आहे. अशी टीका स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केले.
पुण्यात बहुजन मुक्ती पार्टीच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात राजू शेट्टी बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्टीय संयोजक वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. एल. मातंग हे उपस्थित होते.
सध्या जाती जातीत भांडणं लावून राज्यकर्ते गरिबांची डोकी फोडून रक्ताचा गुलाल उधळत आहेत. माझ्यावरही हल्ला झाला होता. मला मारणारे कोण होते ते मला माहित होते. त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला तरी मी त्यांच्याविरोधात तक्रार केली नाही. कारण त्याचे सुत्रधार वेगळे होते. कुत्र्याला दगड मारला की तो दगडाला चावतो. परंतु वाघाला दगड मारला तर तो मारणाऱ्याच्या नरडीचा घोट घेतो. माझी पद्धत वेगळी आहे.असे शेट्टी म्हणाले.