पुणे (बहुजननामा) – राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नुकताच राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते सचिन आहिर शिवसेनेत गेले आहेत. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीतून जाणाऱ्या लोकांवर टिका करणारी पोस्ट रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर केली आहे. संधीसाधू स्वार्थसाठी पक्ष सोडून गेल्याचे रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना रोहित यांनी भरड्या पीठाची उपमा दिली आहे. भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेले कधीही चांगलंच असतं, असाही शालजोडीतील टोला त्यांनी लगावला आहे. दलबदलू नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसते तर त्यांना बोलवायला कोणीच आले नसते असे रोहितने म्हटले आहे.
रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट पुढील प्रमाणे
संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.