बहुजननामा ऑनलाईन- माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलतात असं म्हणत शेट्टींवर टीका केली आहे. राजू शेट्टींसारख्या भंपक माणसाविषयी जास्त काही बोलावे अशी माझी इच्छा नाही असंही ते म्हणाले. सांगलीतील इस्लामपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी राजू शेट्टी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
राजू शेट्टी यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला होता. भंपक आणि फालतू माणसासोबत पुन्हा काम करणार नाही असं ते म्हणाले होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, “आमच्यासारख्या फालतू माणसांमुळंचे तुमची संघटना मोठी झाली. आमच्यासारख्या माणसांमुळंच तुम्ही आमदार खासदार झालात हे विसरलात काय. मला तुमच्यासारखं सरड्यप्रमाणे रंग बदलता येत नाही” असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कोरोना संकटामुळं राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. निकृष्ट बियाणं, दूध दर यावरून शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आता शेतकरी प्रश्नावर अधिक लक्ष द्यावं” असा सल्लाही त्यांनी राजू शेट्टी यांना दिला.
सदाभाऊ खोत म्हणाले, “राजू शेट्टी यांना प्रसिद्धीत राहायचं असतं. म्हणून ते माझं नाव घेतात. परंतु मला त्या भंपक माणसाविषयी जास्त काही बोलण्याची इच्छा नाही. सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवा. 2024 मध्ये आमने सामने आल्यानंतर सदाभाऊच्या विषयावर बोलता येईल” असंही ते म्हणाले.