जयपूर : वृत्तसंस्था – भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेली याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्वच्या सर्व सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराविरोधात दिलावर यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, आता ही याचिका आज न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
राजस्थानमधील बसपाच्या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याविरोधात भाजप आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्याने दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. दिलावर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने याचिका रद्दबातल ठरवली.
बसपाची मागणी देखील रद्द
भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्यालाही पक्षकार करुन घेण्यात यावं अशी मागणी बसपाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर दिलावर यांचीच याचिका रद्द झाल्याने आता बसपाला पक्षकार करण्याचा प्रश्नच येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
बसपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या लखन सिंह, राजेंद्र सिंह गुढा, दीपचंद खेडिया, जोगेंदर सिंह अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधात भाजप आमदार दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्याकडे तक्रार केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या सहा आमदारांवर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, जोशी यांनी या आमदारांवर कोणतीच कारवाई न केल्याने दिलावर यांनी न्यायालयात धाव घेतली.