नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांत घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख पुन्हा डोके वर काढू लागला आहे. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45 हजार 209 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 90 लाख 95 हजार 807 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 33 हजार 227 वर गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशनंतर आता आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार आहे.
राजस्थानमधील आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावला आहे. तसेच मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. . जयपूरमध्ये कलम 144 लागू केले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यातील कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे.
जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर, अलवर आणि भीलवाडा या आठ जिल्ह्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू राहणार आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखाच्या वर
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ९० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, ही दिलासादायक बाब. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे कोरोना प्रतिबंधक लस आणि लसीकरण मोहिमेकडे. सरकारने लसीकरण मोहिमेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.