पुणे बहुजननामा ऑनलाईन – नैसर्गिक न्यायाने दौंडची जागा ही रासपच्या हक्काची आहे. राज्यात रासपला विधानसभेच्या १५ जागा द्याव्यात त्या जागा नाही मिळाल्या तर रासप दुसरा विचार करणार नाही. आम्हाला आमची शक्ती माहीत आहे. त्यामुळे आपली औकात आपल्या चौकात या न्यायाने राजकारण केले पाहिजे असे पशुसंवर्धन मंत्री आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर पत्रकारांशी बोलतना म्हणाले.
महादेव जानकर हे दौंड तालुक्यातील चौफुला आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला आमची ताकद माहित आहे. राज्यात दौंडसह माढा, अहमदपूर, भूम, कळंबोली, परांडा, माण, खटाव, पंढरपूर, फलटण यासह एकूण १५ मतदारसंघात रासपचा प्रभाव आहे. त्यामुळे या जागा रासपला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली.
दौंडचे आमदार राहूल कूल हे आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. अखेर दौंडची जागा रासपकडेच राहिल असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केल्यावर मात्र या चर्चांना पुर्ण विराम मिळाला आहे. मागील निवडणूकीत स्वाभीमानी पक्ष महायुतीमध्ये होता. त्यावेळी त्यांना ९ जागा दिल्या होत्या. आता स्वाभीमानी पक्ष महायुतीसोबत नाही. त्यामुळे या जागा रासप आणि रिपाइंला मिळाव्यात. अशी मागणी त्यांनी केली.