मुंबई बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर शासनाने शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात मराठा समाजाला आरक्षण लागू केले. त्यात आता १३ टक्के आरक्षणानुसार राज्यात नोकऱ्यांमध्ये नियुक्त्या करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गट ब च्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीमध्ये नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. त्यात मराठा समाजातील ३४ जणांना एसईबीसी प्रवर्गाच्या १३ टक्के कोट्यातून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करणारा सार्वजनिक बांधकाम विभाग हा पहिला विभाग ठरला आहे. राज्यात मराठा आरक्षण कायदा नोव्हेंबर २०१७ साली लागू करण्यात आला. राज्य शासनाने महाभरतीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता या पदांची भरती प्रक्रीया सुरु केली. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रिक्त होणाऱ्या ४०५ संभाव्य पदांची भरती प्रक्रिया राबविली गेली. त्यासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रशासनाने ३०० पदांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यात एसईबीसी प्रवर्गातील ३४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाची अंमलबजावणी भरती प्रक्रियेत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठी देखील भरती प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गाची भरती करण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.